Oracle Layoffs 2026 : गेल्या काही काळापासून तंत्रज्ञान विश्वात एकच भीती पसरवली जात आहे, 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' माणसांच्या नोकऱ्या खाणार! अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि आता ओरेकलने भारतातून तब्बल १२,००० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर ही भीती अधिक गडद झाली आहे. पण, खरोखरच 'एआय'मुळे या नोकऱ्या जात आहेत का? की कंपन्या आपले आर्थिक गैरव्यवस्थापन लपवण्यासाठी 'एआय'चे नाव पुढे करत आहेत? सखोल विश्लेषण केल्यास धक्कादायक वास्तव समोर येते.
आकडेवारीचा धसका
| कंपनी | कपात केलेले कर्मचारी | कंपनीचे अधिकृत कारण |
| ओरेकल | १२,००० (भारत) | एआय डेटा सेंटरसाठी निधीची गरज |
| अॅमेझॉन | १६,००० | कार्यक्षमता वाढवणे |
| मायक्रोसॉफ्ट | १५,००० | धोरणात्मक बदल |
| ब्लॉक | ४०% स्टाफ | एआय आता कोडिंग करू शकते |
'एआय' फक्त एक पळवाट?
सध्या कोणताही रोबो किंवा अल्गोरिदम प्रत्यक्ष कामाच्या टेबलवर येऊन बसलेला नाही. तरीही कंपन्या 'एआय'चे नाव घेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे 'एआय सरप्लस' बनवण्याचा कंपन्यांचा अट्टहास. महासाथीच्या काळात या कंपन्यांनी गरजेपेक्षा जास्त भरती केली होती. आता वाढते व्याजदर, महागाई आणि एआयमधील अनिश्चित गुंतवणूक यामुळे या कंपन्या दबावाखाली आहेत. कर्मचाऱ्यांना काढताना "तंत्रज्ञान बदलले आहे" असे कारण दिल्यास जगाचा रोष कमी होतो, हा यामागील खरा डाव आहे.
ओरेकलचे उदाहरण
ओरेकलला आता मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनच्या तोडीचे 'एआय पॉवरहाउस' बनायचे आहे. त्यासाठी त्यांना प्रचंड पैशांची गरज आहे. ओरेकल 'OpenAI' सारख्या ग्राहकांसाठी महागडे डेटा सेंटर्स उभारत आहे. यासाठी बाजारातून ५० अब्ज डॉलर्स उभे करण्याची त्यांची योजना आहे. सुरुवातीला एआयच्या नावाने ओरेकलचा शेअर ६०% वधारला होता, पण खर्च आणि कर्जाचा डोंगर दिसू लागताच तो ५४ टक्क्यांनी कोसळला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ओरेकलची पत धोक्यात आल्याने बँकांनी निधी देण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत ताळेबंद सुधारण्यासाठी 'कर्मचारी कपात' हाच सर्वात सोपा मार्ग कंपन्यांना वाटत आहे.
वाचा - गॅस संपलाय? टेन्शन सोडा, आता ५ मिनिटांत मिळणार 'छोटू' सिलेंडर! इंडियन ऑईलची खास सुविधा
अधिकाऱ्यांना 'इन्सेंटिव्ह' आणि कर्मचाऱ्यांना 'पिंक स्लिप'
एकीकडे मेटा आणि ओरेकल सारख्या कंपन्या एआयसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत आणि आपल्या बड्या अधिकाऱ्यांना कोट्यवधींचे 'स्टॉक इन्सेंटिव्ह' देत आहेत. तर दुसरीकडे, सामान्य कर्मचाऱ्यांच्या घरातील चुलीत पाणी ओतलं जात आहे. हा मुद्दा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा नसून, कंपनीतील संसाधनांच्या वाटपाचा आणि प्राधान्यक्रमाचा आहे.
